तरंग

January 19, 2007

पार्टी…..

Filed under: चौफ़ेर — Giriraj @ 8:54 am

पालिका निवडणुकांच्या निमित्ताने भरपूर धुमाकूळ चलू आहे सर्व पार्ट्यांचा! बाकी हे ‘पार्टी’ नाव अगदीच शोभतं या लोकांना… पार्ट्याच चालू असतात अश्याही यांच्या! ही पार्टी नाही आवडली तर दुसरीत जाऊन मजा मारणे…. टिळकांच्या बाबतितला शेंगांचा किस्सा आम्ही जरा तोडून मरोडून सांगायचो… तसेच या ्पार्ट्यांचे असते.. अगदी तंतोतंत…

असे वाटले की भारतीय जनता पार्टी हा, कॉंग्रेस पार्टी काही करू शकत नाही म्हणून पर्याय आहे.पण गंमतच झाली… त्यांची सगळी वळवळ इतके वर्षे त्यांनी पार्टी केली आता आम्हाला पण करु द्या या प्रकारातली निघाली.बर जाऊ द्या! मी ओरडून पार्ट्यांना फरक पडणार नाहीच..

आपली एक लांबून बघणारी पार्टी झालिये सध्या… नन्तर बघू काय करायचे ते…

November 23, 2006

Filed under: मनातलं — Giriraj @ 7:25 am

रागात स्वतःला आवरणं खूप कठीण असते असे मला काही वाटत नाही.अगदी खूप राग येऊनही शांत राहण्याचा प्रकार करता येतो.आणि मी ते वेळोवेळी करूनही पाहिलंय!पण अशीही वेळ येते जेव्हा आपला ताबा पूर्णपणे सुटतो आणि आपण आपल्याच मनातल्या राक्षसाच्या तालावर नाचायला लागतो.अश्या वेळी मी कितीतरी वस्तू तोडून,मोडून टाकल्या आहेत.खूपदा विचार केला की मी माझा राग असा वस्तूंवर का काढतो?त्यातून होणारं आर्थिक नुकसान खूपदा जास्त असते.एकदा असाच विचार करतांना लक्षात आलं की हा राग कुठेतरी व्यक्त व्हायला हवा,मग तो असा वस्तूंवर निघतो.कितिही चिडलो तरी एखादी वेळ सोडता तो व्यक्तींवर निघत नाही.खरं तर माझं मन अश्या टोकाच्या अवस्थेतही ताबा पूर्ण सुटू देत नाही हेच खरं!

आता पुढची पायरी…

July 11, 2006

मन दौडने लगता है…..

Filed under: Uncategorized — Giriraj @ 12:27 pm

आपली मनःस्थिति आपल्यालाच व्यक्त करता येत नाही. अश्या वेळेस मनाची अगदी चरफ़ड होत असते.

आणि मग अचानक एखादी कविता नाहीतर एखादं गीत आठवतं…

तसंच हेही एक…

कई बार यू भी देखा है

ये जो मनकी सीमारेखा है

मन तोडने लगता है

अनजानी प्यास के पीछे

अनजानी आस के पीछे

मन दौडने लगता है!

June 28, 2006

Filed under: चौफ़ेर — Giriraj @ 6:54 am

बरखा दत्त यांच्या या बातमीवरून:

http://www.ndtv.com/columns/showcolumns.asp?id=1043

मला तर वाततं हेच मराठीबद्दलही तितकंच खरं आहे. जेव्हा महाराष्ट्राच्या ईतरभागातून मुले पुणे किंवा मुंबईत येतात तेव्हा त्यांना हाच अनुभव येतो. अर्थातच त्या त्या भागातिल बोलीनुसारच त्यांचे मराठी किंवा इंग्रजीचे उच्चार असतात. या गोष्टीची सरसकट टिंगल होते.अश्या वेळी शिक्षकांनी याबाबत इतरही मुलांशी बोललं पाहीजे.अश्या प्रकारांमुळे या विद्या्र्थ्यांना न्यूनगंड येऊ शकतो.

आपल्या बोलीही तितक्याच गोड आहेत .. त्यांना जपलंच पाहिजे!

June 21, 2006

आस उस दर की…

Filed under: मनातलं — Giriraj @ 2:16 pm

कधी कधी परीणाम माहीत असूनही आपण काही गोष्टीं मिळवण्यासाठी किंवा मिळण्यासाठी खूपच वेडे होतो.कधी कधी कश्याचीच शाश्वति नसते आणि तरीही आपण पेटून उठतो… गाठायचेच ध्येय म्हणून! अश्या वाटेवर कधी खूप निराश करणारे क्षण येतात.पण मन मानतच नाही.या निराशेतूनच जिद्द उफ़ाळून येते… काय वेड असेल हे? कुठून आलं हे माणसांत?

कधी शहाणपणा म्हणुउन तर कधी व्यवहार म्हणून दूर जाण्याचा प्रयत्न होतो.पण शेवटी हा दूर जाण्याचा विचारच पुन्हा ्त्या ध्येयासाठी झगडण्याची उर्मी देतो.

फ़ैज़ यांचा एक शेर अश्या प्रत्येक वेळेला हमखास आठवतो….

आस उस दर कि छूटती ही नहीं

जाके देखा,न जाके देख लिया

अश्याच एका आशेवर साधलेली ही 'सम'!

May 11, 2006

Filed under: मनातलं — Giriraj @ 11:10 am

'दुखावले जाणे' हाच जर स्वभाव असेल तर? हेटाळणीच्या एका शब्दानेही नाव हेलकावे खाऊ लागते तेव्हा काय करावे?

कुणी चिडून उठतात तसेच चिडावे की शांत रहावे? बरं हे 'शांत' रहाणं दिखावू नकोय ना! त्यापेक्षा कुणाच्या जवळ जाण्याचा प्रयत्नही करू नये हेच उत्तम ,नाही का!पण पण पण….

हे असं अगदी स्वतःच्या मूळ स्वभावाविरुद्ध जाणं जमेल का? मग हेच उत्तम की थोडा वेळ जाऊ द्यावा आपल्या रागाला आणि दुःखाला निवू देण्यासाठी.. हे नाहीच ना स्वभावाविरुद्ध? नाही!मग तसंच करावं.. पण पण पण…

तरीही जर पुन्हा हेच होत राहिलं तर? हळू हळू होऊच की आपणही मोठे… केव्हातरी! चूक-बरोबर न बघता फक्त आपल्या रागाच्या तालावर नाचण्याइतके! कुणाचा विचारही न करण्याइतके.. स्वार्थी,अहंकारी.. मग पहायची असं होण्याची वाट?…

नाही… असं होऊ द्यायचंच नाहिये ना… मग पाहू थोडी वाट उद्याच्या पहाटेची…

April 27, 2006

ट्रॉय

Filed under: Uncategorized — Giriraj @ 9:37 am

ट्रॉय

'होमर' या जगप्रसिद्ध ग्रीक कविचे एक अजरामर महाकाव्य 'इलियड' आहे्ओमर स्वत आंधळा होता असे म्हटले जाते. 'ओडिसी' नावाचे अजून एक महाकाव्य होमरच्या नावावर आहे. या दोन्ही काव्यांचा संदर्भ आहे ट्रॉय म्हणजेच इलियम च्या युद्धाशी. इलियड मध्ये युद्धाचे वर्णन आहे तर ओडिसी मध्ये 'ओडिसियस' या योद्ध्याचे विजयी होऊन परत येण्याचे वर्नन आहे. मूळ काव्यात म्हणे देवादिकांचीही वर्नने आहेत. देवताही या युद्धात तटस्थ राहू शकल्या नव्हत्या.
ट्रोय या चित्रपटाची कहाणि अर्थातच या नगरीवरील विजय आणि तिच्या विद्ध्वंसाची कहाणी आहे. चित्रपटाची कथा मुख्यत फ़िरते ती ऍकिलीज़ आणि राजा हेक्टर यांच्याभोवतीच. कोणत्याही र्‍राष्ट्राशी निष्ठा नसलेला ऍकीलीज़ अर्थातच indivisualist दाखवला आहे तर हेक्टर एक आदर्श राजा,मुलगा,भाऊ,पति दाखवला आहे. अगदी सुरवातिपासूनच दोघा श्रेष्ठ योद्ध्यांच्या स्वभावातले भेद ठळकपणे समोर येत राहतात. युद्धाच्या विरोधात अस्णारा हेक्टर केवळ अपल्या भावासाठी आणि नंतर राज्यासाठी लढायला तयार होतो. तर दुसर्‍या बाजूला केवळ स्वतसाठीच लढणारा थंड डोक्याचा ऍकिलीज़ आपलं नाव अजरामर व्हावं या एका कारणासाठीच लढत असतो. युद्धाची पार्श्वभूमी त्यानंतर त्याची तयारी या प्रस्तावनेत चित्रपट पुढे सरकत
जातो. यात चित्रपट लांबला नसून पुढे होणार्‍या प्रसंगांची दाहकता अधोरेखित होत जाते. हेक्टरचे श्रद्धाळूपण,त्याचा पत्नि आणि मुलांबरोबरचा वेळ,त्याचे वडीलांशी होणारे संवाद अगदी पहात रहावेसे वाटतात. इकडे ऍकिलीज़ देवतांवरही राग खाऊन असतो.
मुळ युद्धा आधीच ऍकिलीज़चा दूरचा भाऊ मारला जातो. शेवटी युद्ध सैनिकांमध्ये न लढवता केवळ दोन्ही बाजूच्या श्रेष्ठ योद्ध्यांमध्येच व्हायचं ठरतं. ज्या पॅरीसमुळे हे सगळं घडतं त्याला मात्र शेवटी न लढवता हेक्टरच उतरतो लढायला आणि दुसर्‍या बाजूला असतो हेक्टरच्या बहीणीला वाचवणारा ऍकिलीज़. दोघांच्या य्द्धाचा प्रसंग या चित्रपटाचा कळस आहे. पार्श्वसंगीत तर काय जमलय या प्रसंगात! एकेक प्रसंग उत्कंठा वाढवत नेतो. दगडाला ठेचाळून हेक्टर खाली पडतो आणि त्या वेळेला त्याच्या बायकोने हाय खाल्लेली स्थिति फ़ारच करूणतेने दाखवली आहे. ऍकिलीज़ अर्थातच वरचढ ठरलेला असतो. हेक्टरच्या मृतूचा
प्रसंग की ज्यात ऍकिलीज़ त्याला भाला मारून ज़मीनदोस्त करतो अतिशय परीणमकरक झालाय. पुढे जगप्रसिद्ध 'त्रॉजन हॉर्स'चा प्रसंग आणि ट्रॉयचा विध्वंस नंतर ऍकिलीज़चा मृत्यू,हेक्टरच्या बहीणीचे दोन्ही विश्व उद्द्वस्त होणे हे सगळेच प्रसंग तितकेच परीणामकारक आहेत.

का म्हणून माणसे एकमेकांच्या जीवावर उठतात?ज्यांचा कधी प्रत्यक्ष संबंध नसतो असे सैनिक कोणत्या भावनेने अनोळखी माणसांना मारत सुटतात?मला नेहेमी पडणारे हे प्रश्न हा चित्रपट पाहतांना पुनःपुन्हा समोर येत राहतात. मी अजूनच युद्धविरोधी झालो हा चित्रपट पाहून!


ग्लॅडिएटरपेक्षा मला हा चित्रपट खूपच आवडला. कलाकारांचे म्हणाल तर हेलेनची भूमिका तशी निमित्तमात्रच होति. ऍकिलीज़ची भूमिका ब्रॅड पिटने तितक्याच थंडपणे साकारली आहे. मी त्याचा एकही चित्रपट या आधी
पाहिला नव्हता. त्याची पिळदार शरिरयष्टी तर हेवा वाटावी अशीच आहे. (मी पुन्हा जिम सुरू केली त्यामुळे)!सर्वात उत्तम भूमिका केली अर्थातच एरीक बाना ने!त्याच्या कॅरेक्टरला वाव अधिक होता आणि सहानुभूतिही त्याच्याच बाजूने जाणारी असली तरीही त्यात एरीकचा वाटा मोठाच आहे.

फ़ार पूर्वी रशियन पुस्तक प्रदर्शनि लागत असे. त्यात 'प्राचीन विश्व इतिहास का परीचय' नावाचं अनुवादित पुस्तक मी घेतलं होतं. त्यात या प्रसंगांचं सचित्र आणि पुराव्यांसहीत वर्णन आहे. उद्ध्वस्त ट्रॉय नगराचे अवशेष त्यात दाखवलेले आहेत. तसेच ऍकिलीज़ हेक्टरच्या मृत शरिराला आपल्या रथाच्या मागे बांधून नेतो असा प्रसंग चितारलेले कलशही त्यात दाखवलेले आहेत. ख्रिस्तपूर्व काळातल्या या युद्धाचे महाभारताशी असलेले साम्य थोडे चकित करणारे आहे हे निश्चित. या चित्रपटात केवळ शेवटच्या युद्धाचा परामर्श घेतला आहे.पण मूळात ट्रोय नगर ताब्यात घेण्यासाठी दहा वर्षांपासून संघर्ष चालू होता आणि
शहराच्या रचनेमुळे तसेच त्याच्याभोवतालच्या तटबंदीमुळे ते शक्य होत नव्हते.

वारंवार पाहूनही पुन्हा पहावासा वाटणारा हा चित्रपट आहे.

April 18, 2006

Filed under: मनातलं — Giriraj @ 6:39 pm

पूर्वी क्रिकेट मॅच म्हणजे ज़बरदस्त उत्कंठा असायची. आज मला तसं होत नाही.हे असं व्हायला मॅचफ़िक्सिंग प्रकरण तितकसं कारणीभूत नाही.तशीच उत्कंठा WWF बद्दल असायची.त्यासाठी मी घरात अगदी भांडणंही करायचो.पण कोण्या एका क्षणी अचानक ही वेडं निघून गेली.आता तर wwf चा तिटकारा वाटतो.सध्या (मागच्या तीन वर्षांपासून)माझा आवडता खेळ F1 racing आहे. पण वर्षभरापासून एकही ग्रां प्रि पाहिली नाही.एखाद्या गोष्टीवाचून फ़रक पडत नाही म्हटलं की आपण त्यापासून आपोआप दूर होत जातो.मी तर स्वतःशीच हा खेळ खेळून बघत असतो.एका बिंदूवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करायचं आणि अचानकपणे ते काढून घ्यायचं! कधी जमतं तर कधी नाही!नाही जमत त्यावेळेस अजून एक खेळ मिळतो मनाला!

April 12, 2006

Filed under: मनातलं — Giriraj @ 11:44 am

अमूक एक व्यक्ती मला कळली,असं केव्हा म्हणता येऊ शकतं? मला नाही वाटत असं तितक्या ठामपणे मला कधी म्हणता येईल.हातात आली म्हणता म्हणता सहज निसटून जाणार्या नात्यांना काय म्हणावं? तर्कसंगति कोलमडून पडावी अशी का वागतात माणसं? 'मला काही फ़रक पडत नाही', असं आपण स्वतःलाच पट्वून देणं अवघडच असतं. कधी भावविश्व दुखावले गेल्याने तर कधी अहंकार,अभिमान,स्व (काहीही म्हणा!) दुखावला गेल्याने आपल्या 'काही फ़रक पडत नाही' मध्ये काही दम नसतो.पण हे स्वीकारणं अवघड जातंच.आतून उठलेले तरंग इतक्या सहजी निवत नाहीत,लाटा होऊनच शांतावतात ते! या लाटेवर माझा अभिमान स्वार होऊ न देणं एव्हढंच सध्या बघायचं!

तरंग.. !!!

Filed under: Uncategorized — Giriraj @ 10:49 am

विविध घटनांचे पडसाद मनाच्या तळ्यात उमटतात! कधी मनाचा तळ ढवळून काढत तर कधी अगदी वरवरच तरंग उठतात.
असेच हे तरंग…..

गिरीश

Blog at WordPress.com.